भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेटविश्वाला एकच धक्का बसला होता. विराट कोहलीच्या नाराज चाहत्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगच्या (Harbhajan Singh) मुलीचाही समावेश होता. विराट कोहलीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर माझी मुलगी फार भावनिक झाली होती असा खुलासा हरभजन सिंगने केला आहे. चिमुरडीने वडिलांना अनेक प्रश्न विचारत विराट कोहलीने अचानक घेतलेल्या निर्णयामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा वडील योग्य उत्तर देण्यात असमर्थ ठरत आहेत असं लक्षात आल्यानंतर तिने स्वत: विराट कोहलीशी संपर्क साधण्याचं ठरवलं.
हरभजनने सांगितलं की, त्याची मुलगी हिनायाने कोहलीला मेसेज करून त्याच्या कसोटी बॉल कारकिर्दी संपवण्याच्या निर्णयामागील कारणे विचारली. हा मेसेज पाहिल्यानंतर विराक कोहलीदेखील काहीसा भावूक झाला. त्याने तिला उत्तर दिलं की, "बेटा, वेळ झाली आहे."
"मी ट्विट केलं आणि विचारलं की का, विराट का? तू कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतलीस? माझ्या मुलीनेही मला विचारले, 'बाबा, विराट का निवृत्ती घेत आहे?' तिने विराटला मेसेज करून म्हटले, 'मी हिनाया बोलत आहे, विराट, तू निवृत्ती का घेतलीस?'. या मेसेजनंतर विराटही भावूक झाला. तो हसला आणि उत्तर दिलं की, 'बेटा, वेळ झाली आहे'. त्याला सर्वोत्तम गोष्टीची जाण आहे," असं हरभजनने Instant Bollywood शी संवाद साधताना म्हटलं.
हरभजन आणि कोहली यांनी भारतासाठी 8 कसोटी, 41 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामने एकत्र खेळले आहेत. 2011 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचाही ते भाग होते.
कोहलीने 12 मे रोजी कसोटीमधून निवृत्तीची घोषणा केली. 36 वर्षीय विराट कोहलीने भारतासाठी 123 कसोटी सामन्यांमध्ये 46.85 च्या सरासरीने 30 शतकांसह 9230 धावा केल्या. टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्याने टी-20 मधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. यामुळे आता विराट कोहली फक्त एकदिवसीय सामने खेळताना दिसणार आहे.
"मी या फॉरमॅटमधून बाहेर पडत असताना, ते सोपे नाही. पण मला हे योग्य वाटत आहे. मी माझ्याकडे असलेलं सर्व काही दिलं आहे आणि मी ज्या अपेक्षा करू शकत होतो त्यापेक्षा खूप जास्त मला परत दिलं आहे. मी कृतज्ञतेने भरलेल्या मनाने निघून जात आहे, खेळासाठी, ज्या लोकांसोबत मैदान शेअर केले त्यांच्यासाठी आणि प्रवासात मला ओळख मिळवून देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी," असं त्याने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं होतं.
विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार होता, ज्याने 2022 मध्ये कर्णधारपद सोडण्यापूर्वी 68 सामन्यांमध्ये 40 विजय आणि 17 पराभवांची नोंद केली. त्यानंतरचा सर्वोत्तम कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे ज्याने 60 पैकी 27 विजय मिळवले आहेत.