IND VS ENG Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यातील टेस्ट सीरिजचा तिसरा सामना हा लॉर्ड्स मैदानावर खेळवला जात असून तिसऱ्या दिवशी भारताने फलंदाजी करून 10 विकेट गमावत इंग्लंडच्या 387 धावांची बरोबरी केली. या दरम्यान टीम इंडियाकडून केएल राहुलने शतक तर ऋषभ पंत आणि जडेजाने अर्धशतक लगावलं. या खेळीनंतर तिन्ही फलंदाजांच्या कामगिरीचं कौतुक होत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी विकेटकिपर ऋषभ पंतला विकेटकिपिंग करताना हाताला दुखापत झाली होती. मात्र वेदनेत असताना सुद्धा देशासाठी खेळताना पंतने केलेल्या कामगिरीचं राहुलने कौतुक केलं.
भारतासाठी पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना केएल राहुलने 100 धावा, ऋषभ पंतने 74 धावा आणि रवींद्र जडेजाने 72 धावा केल्या. लॉर्ड्सवरील शतकानंतर केएल राहुलची मुलाखत घेण्यात आली. तेव्हा त्याने ऋषभ पॅन्टच्या दुखापतीबाबत माहिती दिली. राहुल म्हणाला की, 'बॅट पकडताना त्याला खूप वेदना होत होत्या. जेव्हा बॉल तुमच्या बॅटवर लागतो, तेव्हा खूप घर्षण होतं. त्याला काहीवेळा ग्लव्सवर सुद्धा दुखापत झाली, जे योग्य नसतं. तो मला सारखं म्हणत होता की तो अनेक बॉल सोडत आहे, ज्या चौकारासाठी जाऊ शकला असता. तो या गोष्टीने खूप नाराज होता. मी फक्त त्याला एवढंच म्हणालो कि पर्यायांकडे लक्ष ठेव की कोणता शॉट हा बाउंड्री पार जाऊ शकतो'.
लॉर्ड्सच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सेशनमध्ये टीम इंडियाला मोठा झटका बसला. 34 व्या ओव्हरला ऋषभ पंतच्या डाव्या हाताला बॉल लागला. त्यानंतर तो वेदनेनं कळवळू लागला. बुमराहच्या ओव्हरमधील पहिल्या बॉलला कलेक्ट करताना पंत दुखापतग्रस्त झाला. मैदानात फिजिओला बोलवण्यात आले. पण प्रथमोपचार केल्यावर सुद्धा त्याला बरं वाटलं नाही. त्याने कसे तरी स्वतःला विकेटकीपिंगसाठी तयार केले. त्याने ओव्हर संपवली आणि मग तो वेदनेनं कळवळत अचानकपणे मैदान सोडून ड्रेसिंग रूममध्ये जाऊ लागला. त्याच्या जागी ध्रुव जुरेलला पर्यायी विकेटकीपर म्हणून मैदानावर बोलावण्यात आले.