IND VS ENG 3st Test : आंतरराष्ट्रीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरा टेस्ट सामना खेळवला जातोय. 10 जुलै रोजी या सामन्याचा पहिला दिवस होता. या दिवशी इंग्लंडने मागच्या दोन सामन्यांच्या तुलनेत संथ खेळी करत 251 धावा केल्या तर टीम इंडियाच्या गोलंदाजांना सुद्धा त्यांचे 4 विकेट घेणं शक्य झालं. दरम्यान पहिल्या दिवशी काही वेळासाठी टीम इंडियाचं कर्णधारपद हे केएल राहुलकडे (KL Rahul) सोपवण्यात आलं. परंतु राहुल कर्णधार किंवा उपकर्णधार नसताना सुद्धा असं का करण्यात आलं असा प्रश्न काही चाहत्यांना पडला.
लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी टेस्ट कर्णधार शुभमन गिल काही वेळासाठी मैदान सोडून बाहेर गेला होता. तिसऱ्या सेशन दरम्यान हे घडलं. त्यानंतर केएल राहुल उपकर्णधार नसताना सुद्धा टीम इंडियाचं नेतृत्व त्याच्याकडे सोपवण्यात आलं. दरम्यान राहुलने फिल्डिंग विषयी अनेक निर्णय घेऊन योग्य ते बदल केले. गिलच्या अनुपस्थितीत केएल राहुलने कर्णधारपदाची जबाबदारी यासाठी निभावली, कारण 34 व्या ओव्हरला ऋषभ पंतच्या हाताला दुखापत झाल्याने तो मैदानातून आधीच बाहेर पडला होता.
हेही वाचा : ऋषभ पंतची दुखापत किती गंभीर? तिसऱ्या मॅचमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट्स
लॉर्ड्सच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सेशनमध्ये टीम इंडियाला मोठा झटका बसला. 34 व्या ओव्हरला ऋषभ पंतच्या डाव्या हाताला बॉल लागला. त्यानंतर तो वेदनेनं कळवळू लागला. बुमराहच्या ओव्हरमधील पहिल्या बॉलला कलेक्ट करताना पंत दुखापतग्रस्त झाला. मैदानात फिजिओला बोलवण्यात आले. पण प्रथमोपचार केल्यावर सुद्धा त्याला बरं वाटलं नाही. त्याने कसे तरी स्वतःला विकेटकीपिंगसाठी तयार केले. त्याने ओव्हर संपवली आणि मग तो वेदनेनं कळवळत अचानकपणे मैदान सोडून ड्रेसिंग रूममध्ये जाऊ लागला. त्याच्या जागी ध्रुव जुरेलला पर्यायी विकेटकीपर म्हणून मैदानावर बोलावण्यात आले.
केएल राहुल हा टीम इंडियाचा एक अनुभवी विकेटकिपर आणि फलंदाज आहे. सीरिजमधील पहिल्या टेस्ट सामन्यात राहुलने शतक ठोकलं होतं. लॉर्ड्स मैदानावर सुद्धा टेस्ट सामना खेळण्याचा जास्त अनुभव राहुलच्या गाठशी आहे. म्हणूनच कर्णधार आणि उपकर्णधारांच्या अनुपस्थितीत त्याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आलं असावं.