IND vs ENG 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हलमध्ये सुरू असलेल्या शेवटच्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात आता भारत अडचणीत सापडलेला दिसतो. इंग्लंडला विजयासाठी केवळ 35 धावांची गरज आहे, तर भारताला उरलेले 3 गडी बाद करावे लागतील. पण जर हा सामना भारत हरला, तर एका खेळाडूवर संपूर्ण दोष जाईल, अशी सगळीकडे चर्चा होत आहे आणि तो खेळाडू आहे वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा.
या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाने 3 महत्त्वाचे विकेट्स घेतले असले, तरी त्यांनी अक्षरशः धावांची पाटच सुरू केली. दुसऱ्या डावात त्यांनी 22.2 षटकांत तब्बल 109 धावा दिल्या. त्यांच्या अचूकतेच्या अभावामुळे इंग्लंडने सहजपणे 339 धावा जमवल्या आणि सामना पूर्णपणे आपल्या बाजूने खेचून नेला. विशेष म्हणजे, प्रसिद्ध कृष्णाने एका षटकात 16 धावा लुटवल्या आणि तेच या सामन्याचं 'टर्निंग पॉइंट' ठरलं. या क्षणानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी आपली लय पकडली आणि भारत सामना गमावण्याच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचला.
या कामगिरीनंतर असा अंदाज व्यक्त केला जात आहे की प्रसिद्ध कृष्णाचा टेस्ट संघातून पत्ता कट होऊ शकतो. त्यांच्या कामगिरीवर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका सुरू आहे. कसोटी सामन्यात वनडे स्टाइल गोलंदाजी करणं हे भारतीय संघासाठी धोकादायक ठरत आहे.
हे पहिल्यांदाच नाही. याआधी लीड्स आणि बर्मिंघम कसोटीत प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळाली होती, पण तिथेही त्यांनी अत्यंत महागडी गोलंदाजी केली. लीड्समध्ये त्यांनी दोन्ही डाव मिळून 42 षटकांत 220 धावा दिल्या. बर्मिंघममध्ये त्यांनी 27 षटकांत 111 धावा खर्च केल्या. या दोन्ही सामन्यांत त्यांनी एकूण 6 विकेट्स घेतल्या, पण त्यांच्या इकॉनॉमी रेटने संघाला फटका बसला.
जर भारत हा सामना हरला, तर गेल्या 7 वर्षांतील इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी मालिका गमावेल. भारताने 2018 नंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका गमावलेली नाही. त्यामुळे ही टेस्ट जिंकणं हे केवळ सामना जिंकणं नव्हे, तर गौरव टिकवण्याचा प्रश्न ठरणार आहे.