India vs England Test Series Shubman Gill: भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना उद्यापासून म्हणजेच 20 जूनपासून लीड्स येथे खेळवण्यात येणार आहे. त्यापूर्वीच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून दमदार कामगिरी करणाऱ्या जॉस बटलरने या मालिकेसाठी पहिल्यांदाच भारताच्या कसोटी संघाचं नेतृत्व करणाऱ्या शुभमन गिलबद्दल मोठं विधान केलं आहे. इंग्लंड दौऱ्याच्या काही आठवडे आधीच विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी एकामागोमाग एक निवृत्ती जाहीर केल्याने या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला तेव्हा कर्णधार म्हणून शुभमन गिलची निवड करण्यात आली. या मालिकेपासून भारतीय क्रिकेटमधील गिलपर्व सुरु होत असल्याचंही या निवडीनंतर म्हटलं होतं. मात्र आता गिलसंदर्भात बटलरने मोठं विधान केलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या स्पर्धेआधी बटलरने गिल आणि नेतृत्वागुणांसंदर्भात भाष्य केलं आहे.
खरं तर बटलर 2025 च्या आयपीएल पर्वात शुभमनच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सच्या संघातून खेळला आहे. राजस्थानच्या संघाने बटलरला रिटेन केलं नाही. त्यामुळे तो यंदा गुजरातकडून खेळला. बटलर आणि शुभमन दोघांसाठीही हे पर्व फलंदाजीच्या दृष्टीने फारच उत्तम ठरलं. या दोघांना साई सुदर्शनने उत्तम साथ दिल्याचं पाहायला मिळालं. या तिघांच्या फलंदाजीच्या जोरावरच गुजरातने प्ले ऑफपर्यंत मजल मारली होती. आता याच शुभमनबद्दल कसोटी मालिका सुरु होण्याआधी बटलरने एक मोठं विधान एका पॉडकास्टदरम्यान केलं आहे.
"मला नाही वाटत की आम्हाला कधी या लोकांच्या प्रसिद्धीची आणि त्यांच्याबद्दल लोकांना वाटत असलेल्या उत्सुकतेची कल्पना करता येईल. संपूर्ण आयपीएलमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळेल. तुम्हाला या साऱ्याची कल्पना असते. मात्र ते हे सारं जगत असतात. मला वाटतं ते असं म्हणतात की भारतीय कसोटी संघाचा कर्णधार हा देशातील तिसरा किंवा चौथा सर्वात प्रभावशाली व्यक्ती असतो. पंतप्रधानांनंतर तोच असतो. त्यामुळे सर्वांचं तुमच्याकडे खास लक्ष असतं," असं बटलरने इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टूअर्ट ब्रॉडच्या 'द लव्ह ऑफ क्रिकेट' या पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे.
कर्णधार म्हणून शुभमन कसा आहे असं विचारलं असता इंग्लंडचा माजी कर्णधार राहिलेल्या बटलरने शुभमन हा फार शांत, संयमी, मोजून मापून निर्णय घेणारा आणि इंट्रेस्टींग असल्याचं म्हटलं. गिल हा गुणांच्याबाबतीत रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं मिश्रण असलेला खेळाडू आहे, असंही बटलर म्हणाला. कोहली थेट नडणारा कर्णधार होता तर रोहित हा शांत आणि संयमी होता. मात्र दोघांचा मैदानावरील वावर हा प्रभाव टाकणारा होता, असं बटलरने आवर्जून सांगितलं.