Shaheen Afridi Vs Virat Kohli in IND vs PAK: भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरांनी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीवर गंभीर आरोप केला आहे. रविवारी दुबईच्या अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यादरम्यान शाहीन शाह आफ्रिदीने भारताच्या विराट कोहलीचं शतक होऊ नये म्हणून मुद्दाम वाईड चेंडू टाकल्याचं गावसकरांनी म्हटलं आहे. गावसकरांनी शाहीन शाह आफ्रिदीने असं का केलं असावं आणि यामागे काय विचारसरणी असते याबद्दल भाष्य केलं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघासमोर 242 धावांचं टार्गेट असताना विराट कोहलीही शतकाच्या जवळ होता. त्यामुळेच विराटला शतकापासून दूर ठेवण्याचा पाकिस्तानी संघाचा प्रयत्न होता. विराटला बाद करण्यात अपयश येत असल्याने विराटचं शतक होण्याआधीच भारत लक्ष्यापर्यंत पोहचावा असा प्रयत्न पाकिस्तानकडून झाल्याचं सामन्यातील शेवटच्या काही ओव्हरमध्ये दिसून आलं. याबद्दल गावसकर उघडपणे बोलले आहेत. शाहीन शाह आफ्रिदीने मुद्दाम वाईड चेंडू टाकले. विराटला शतकापासून दूर ठेवण्यासाठीच हा प्रकार करण्यात आल्याचं गावसकरांनी म्हटलं आहे. कोणत्याही संघाला आपल्याविरोधात शतक झळकावलं जावं असं वाटत नाही. खास करुन जेव्हा संघ हरत असतो तेव्हा असं केलं जातं, असं विधान गावसकरांनी केलं आहे.
कोहली त्याच्या करिअरमधील 51 व्या शतकाजवळ असतानाच शाहीन शाह आफ्रिदीने 42 व्या ओव्हरमध्ये तीन वाईड चेंडू टाकले. हा प्रकार प्रेक्षकांच्याही लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड करुन आफ्रिदीला डिवचलं. मात्र असे प्रयत्न झाल्यानंतरही विराटने सामन्यात कुशदील शाहने टाकलेल्या 43 ओव्हरमध्ये 96 धावांवर असताना चौकार लगावत शतक झळकावण्याबरोबरच भारताला विजयही मिळवून दिला.
नक्की वाचा >> भारत Champions Trophy च्या सेमी-फायनलमध्ये; हा सामना किती तारखेला आणि कोणाविरुद्ध?
या सामन्याबद्दल 'इंडिया टुडे'शी बोलताना गावसकरांनी पाकिस्तानला विराटने केलेला 90 ते 99 मधली धावसंख्या मान्य झाली असती पण त्यांना त्याचं शतक होऊ द्यायचं नव्हतं, असं म्हटलं आहे. "मला वाटतं शाहीन आफ्रिदीने विराट शतकापर्यंत पोहचू नये म्हणून मुद्दाम वाईड चेंडू टाकले. पाकिस्तानविरुद्ध कोहलीने 90 च्या आसपास धावा केल्या तर ते मान्य करु शकतो पण शतक नाही, असा विचार असावा. विराटने शतक करु नये असं त्यांना वाटत होतं. आता आपण जिंकणार नाही असं वाटत असताना कोणत्याही संघाला आपल्याविरुद्ध समोरच्या संघातील खेळाडूने नवा विक्रम करावा असं वाटणार नाही. त्यातही तो विक्रम सर्वाधिक शतकांचा असो, पाच विकेट्स घेण्याचा असो किंवा त्यांच्याच संघाचा सर्वात कमी धावसंख्येचा असो. हे असले विक्रम आपल्याविरोधात नको असं प्रत्येक संघाला वाटतं," असं गावसकर म्हणाले.
नक्की पाहा हा Video >> गिलला Attitude दाखवणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचा माज विराटने क्षणात उतरवला
विराटने पाकिस्तान विरुद्धचं चौथं शतक झळकावताना आपल्या एकदिवसीय करिअरमध्ये 14 हजार धावांचा टप्पाही ओलांडला.