Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

हार्दिकच्या 'त्या' निर्णयामुळे मॅच पंजाबच्या बाजूने फिरली; श्रेयसनेच सांगितला Turning Point

Shreyas Iyer Talks About Turning Point IPL 2025 MI vs PBKS Match: हा सामना पंजाबने श्रेयसच्या फलंदाजीच्या जोरावर जिंकला.

हार्दिकच्या 'त्या' निर्णयामुळे मॅच पंजाबच्या बाजूने फिरली; श्रेयसनेच सांगितला Turning Point

Shreyas Iyer Talks About Turning Point IPL 2025 MI vs PBKS Match: क्रिकेटच्या सामन्यात शेवटचा चेंडू टाकला जात नाही किंवा शेवटची धाव पूर्ण होत नाही तोपर्यंत नेमकं काय होईल हे सांगता येत नाही, असं म्हणतात. मात्र इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या पर्वातील दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्जच्या संघाने मुंबई इंडियन्सच्या संघाने दिलेलं विक्रमी आव्हान 6 चेंडू बाकी ठेवतच पूर्ण केलं. पंजाबने सामना पाच विकेट्सने जिंकत मोठ्या दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. या सामन्याचा खरा हिरो ठरला पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर! श्रेयस अय्यरने 19 व्या ओव्हरला लगावलेल्या चार षटकारांची चर्चा आहे. नाणेफेकही निर्णयाक ठरल्याचं सांगितलं जातंय. मात्र सामन्यानंतर श्रेयस अय्यरने सामना पंजाबचा संघ 35 धावांवर असताना फिरल्याची कबुली दिली आहे. मात्र सामन्यातील चौथ्या ओव्हरनंतरच असं काय झालं की त्यामुळे सामना फिरला असं श्रेयसचं म्हणणं आहे ते समजून घेऊयात...

पांड्याच्या एका निर्णयाने सामना आमच्या बाजूने फिरला

पंजाबचा संघ रविवारच्या विजयानंतर 3 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध अंतिम सामना अहमदाबादच्या मैदानात खेळणार आहे. याच मैदानात झालेल्या क्वालिफायर-2 मध्ये श्रेयस अय्यरने सामना पाचव्या ओव्हरला फिरल्याची कबुली विजयानंतर प्रशिक्षक रिकी पॉण्टींगशी बोलताना दिली आहे. 204 धावांचा पाठलाग करताना पंजाबने 13 धावांवरच पहिला गडी प्रभसिमरनच्या रुपाने गमावला. मात्र त्यानंतर मैदानात आलेल्या जॉश इंग्लीशचा मैदानात चांगलाच जम बसला. जॉश आणि सलामीवीर प्रियांश आर्याची जोडी जमला आणि धावगती वाढली. याचदरम्यान पाचव्या षटकाआधी मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने घेतलेल्या एका निर्णयाने सामना आमच्या बाजूने फिरल्याचं श्रेयसने म्हटलं आहे.

नेमकं काय झालं त्या ओव्हरला?

पंजाबच्या डावातील पाचव्या षटकं टाकण्यासाठी मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने त्याचा हुकुमी एक्का जसप्रीत बुमराहकडे चेंडू सोपवला. बुमराह नेहमीप्रमाणे विकेट मिळवून देईल अशी अपेक्षा मुंबईच्या चाहत्यांना होती. मात्र बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला. त्यानंतर पुढचा चेंडू निर्धाव गेला आणि तिसऱ्या चेंडूवर जोरदार षटकार लगावला. चौथा चेंडू निर्धाव गेला. पाचव्या आणि सहाव्या चेंडूवरही जॉशने चौकार आणि षटकार लगावला. जॉश इंग्लीशने बुमराहच्या पहिल्याच षटकामध्ये 20 धावा केल्या. ही या पर्वातील बुमराहची सर्वात महागडी ओव्हर ठरली. श्रेयसच्या मते हीच निर्णायक ओव्हर ठरली.

श्रेयस काय म्हणाला?

श्रेयसने सामन्यानंतर हार्दिकने बुमराहला गोलंदाजीसाठी पहिल्यांदाच संधी दिलेल्या सामन्यातील पाचव्या ओव्हरबद्दल भाष्य केलं. "जॉश इंग्लिशनं बुमराहविरुद्ध केलेल्या फटकेबाजीमुळे आम्हाला विश्वास निर्माण झाला आणि आमचा आत्मविश्वास वाढला. याच सकारात्मक धक्क्याची आम्हाला त्यावेळी गरज होती आणि त्या ओव्हरमधून तो मिळाला," असं श्रेयसने पॉण्टींगशी चर्चा करताना म्हटलं. हार्दिकचा हा निर्णय पंजाबच्या पथ्यावर पडल्याचं श्रेयसचं म्हणणं होतं.

पंजाबची विक्रमी कामगिरी

रविवारच्या सामन्यापूर्वी 18 वर्षांमध्ये कोणत्याही संघाने मुंबईच्या संघाविरुद्ध 200 हून अधिक धावांचा पाठलाग करुन सामना जिंकला नव्हता. आता पंजाबचा संघ अंतिम सामना बंगळुरुविरुद्ध खेळणार आहे. 

Read More