Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

मुंबईच्या फॅन्सने वानखेडेच्या मैदानावर..; 'त्या' कृतीमुळे शाहरुखही थक्क! 'KKR च्या पराभवापेक्षा त्याला..'

Shah Rukh Khan About Mumbai Indian Fan: केकेआरचा मालक असलेल्या शाहरुख खानने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसंदर्भातील एक कटू आठवण शेअर केली आहे.

मुंबईच्या फॅन्सने वानखेडेच्या मैदानावर..; 'त्या' कृतीमुळे शाहरुखही थक्क! 'KKR च्या पराभवापेक्षा त्याला..'

Shah Rukh Khan About Mumbai Indian Fan: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख हा 2008 च्या इंडियन प्रिमिअर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा मालक झाल्यानंतर फारच उत्साही होती. आपल्या संघाला या स्पर्धेच्या सुरुवातीलाच मोठं यश मिळेल अशी शाहरुखची अपेक्षा होती. मात्र घडलं काहीतरी वेगळं. सुरुवातील अनेक वर्ष केकेआरचा संघ या स्पर्धेत संघर्ष करताना दिसला. आज या संघाकडे आयपीएलची तीन जेतेपदं आहेत. या साऱ्या प्रवासामध्ये शाहरुख संघाच्या पाठीशी मालक म्हणून खंबीरपणे उभा राहिला असला तरी हा प्रवास त्याच्यासाठी फारच भावनिक होता. 2014 साली याचसंदर्भात प्रदार्शित झालेल्या 'लिव्हींग विथ केकेआर' नावाच्या डॉक्युमेंट्रीमध्ये शाहरुखने या प्रवासाबद्दल मन मोकळं केलं होतं. याच वेळी बोलताना वेगवेगळ्या क्रिकेटच्या मैदानांमध्य कशाप्रकारे आपली खिल्ली उडवली गेली याबद्दलही शाहरुखने भाष्य केलं होतं. कलाकार म्हणून लोकांची प्रचंड प्रेम दिलेलं असतानाच संघ मालक म्हणून मिळालेल्या या वागणुकीमुळे शाहरुख दुखावला होता, असंही या मुलाखतीतून अधोरेखित झालं.

...म्हणून आयपीएलमधील संघाचा मालक झालो

या डॉक्युमेंट्रीमध्ये शाहरुख खानने त्याला कधीच आयपीएलशी संलग्न होण्याची इच्छा नव्हती. मात्र हा निर्णय खासगी निवड नसून या खेळाबद्दल असलेल्या प्रेमातून घेतल्याचं शाहरुखने सांगितलं. क्रिकेटच्या मैदानात मिळेलेले काही अनुभव हे फार नकारात्मक होते असंही शारुख म्हणाला. "मला खासगी यश मिळवण्यासाठी कधीच आयपीएलशी संलग्न व्हायचं नव्हतं. या गोष्टींमुळे माझ्या आयुष्यात काही नकारात्मक अनुभव मिळाले. यापूर्वी कधीच मैदानात माझी खिल्ली उडवण्यात आली नव्हती. मी गळ्यात गिटार घालून लाखो लोकांच्या गर्दीतून आरामात चालायचो. त्यावेळी लोक मला प्रोत्साहन द्यायचे. मात्र आयपीएलदरम्यान काही स्टेडियममध्ये माझी खिल्ली उडवण्यात आली. तेव्हा मला क्षणभरासाठी असं वाटून गेली ही हा तोच देश आहे का जिथे मी फार मोठा सिनेस्टार आहे?" असं शाहरुख म्हणाला.

वानखेडेवरील सामन्यात मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी...

त्यावेळी केकेआरचा संघ निर्देशक असलेल्या जॉय भट्टाचार्य यांनी 2008 साली मुंबई आणि केकेआरदरम्यान वानखेडेच्या मैदानावर झालेल्या सामन्यादरम्यानचा एक किस्सा सांगितला. या सामन्यासाठी उपस्थित राहिलेल्या शाहरुख खानला तेव्हा अनेक दशकांपासून ज्या शहरात राहून तो मोठा स्टार झाला त्याच मुंबई शहरात मुंबई इंडियन्सच्या समर्थकांनी त्याची खिल्ली उडवली तेव्हा त्याला फार धक्का बसला होता, असं जॉय म्हणाला. "आम्ही सामना पराभूत झालो म्हणून त्याला दु:ख झालं नव्हतं तर ज्या शहराला त्याने आपलं म्हटलं त्या शहरात त्याला मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांकडून जशी वागणूक देण्यात आली त्यामुळे तो फार दुखावला होता," असं जॉयने म्हटलं. 

शाहरुखने केलेली एकच विनंती...

क्रीडा पत्रकार गौतम भट्टाचार्य यांनी या सामन्यापूर्वी शाहरुख खानने त्याच्या संघाला एक भावनिक आवाहन केलं होतं. "तो म्हणाला होता, मुंबईत मला किंग म्हणतात. मी तुमच्याकडे कधीच काही मागितलेलं नाही. मात्र माझ्यासाठी हा सामना जिंका," अशी माहिती गौतम यांनी दिली. मात्र हा सामना केकेआरचा संघ हरला. या पराभवाने शाहरुख फारच खचला होता. "मी माझ्या कामामध्ये एक गोष्ट कायम पाळतो ती म्हणजे कधीच चाहत्यांना निराश करायंच नाही. मात्र माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला असं वाटलं की आपण चाहत्यांना निराश केलं," असं शाहरुख या पराभवानंतर म्हणालेला. 

Read More