India VS Pakistan : भारत विरुद्ध पाकिस्तान( India VS Pakistan) हे दोन संघ जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने येतात तेव्हा या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते. यंदा आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे (Champions Trophy 2025) आयोजन पाकिस्तानात करण्यात आले आहे. तब्बल 29 वर्षांनी आयसीसी टूर्नामेंट पाकिस्तानात होतं आहे. मात्र अशावेळी भारत सरकारने टीम इंडियाला सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिल्याने भारताचे सर्व सामने हे दुबईत खेळवले जात आहेत. 23 फेब्रुवारी रोजी भारत - पाक सामन्यात भारताने 6 विकेट्सने पाकिस्तानचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीतील सलग दुसरा सामना जिंकला. जेव्हा जेव्हा भारत - पाक सामना होतो तेव्हा तेव्हा मैदानात काहीना काहीतरी ड्रामा पाहायला मिळतो. असाच एक राड्याचा किस्सा 1989 रोजी सुद्धा घडला होता.
1989 मध्ये भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध कसोटी मालिकेचा पहिला सामना खेळण्यासाठी पाकिस्तानात गेला होता. यावेळी पाकिस्तान त्यांच्या वेगवान गोलंदाजीमुळे भारतावर नेहमीच वरचढ ठरायचा. परंतु 1989 मध्ये भारताचा पाकिस्तान दौरा हा खेळाचे मैदान समान करण्यासाठी होता. या दौऱ्यात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय संघाकडून पदार्पण केले होते. सोबतच संजय मांजरेकर याने देखील या सीरिजमध्ये पाकिस्तान विरुद्ध 7 डावांमध्ये एकूण 569 धावा केल्या होत्या.
हेही वाचा : चॅम्पियन्स ट्रॉफीवर दहशतवादी हल्ला आणि खेळाडूंच्या अपहरणाची धमकी? पाकमध्ये न जाण्याचा भारताचा निर्णय योग्यच
कराची आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवला गेला. त्याकाळात काश्मीर मुद्दा तापला होता आणि दहशतवाद फोफावत चालला होता. यावेळी सामना सुरु असतानाही पाकिस्तानचे चाहते काश्मीर समर्थनार्थ घोषणाबाजी करत होते. त्यामुळे मैदान आणि मैदानाबाहेर सुद्धा वातावरण तणावपूर्ण होतं. काश्मीर प्रकरण चिघळल्याने पाकिस्तानी नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण होतं. या दरम्यान एक अशी घटना घडली ज्यामुळे भारतीय संघच नाही तर पाकिस्तानी संघ सुद्धा हादरला होता.
In 1989 Pakistani Spectator Attacked Indian Captain Srikant During Karachi Test Match
— indianhistorypics (IndiaHistorypic) June 18, 2024
Kapil Dev Was Shocked pic.twitter.com/sGxAGw9GHh
भारतीय संघ फिल्डिंग करता असताना एक प्रेक्षक अचानक मैदानात घुसला. धावत तो भारताचा त्यावेळचा कर्णधार के श्रीकांत यांच्या जवळ गेला आणि त्यांच्याशी वाद घालू लागला. टाईम्स नाऊने दिलेल्या माहितीनुसार यावेळी मैदानात आलेल्या प्रेक्षकाने भारतीय कर्णधाराशी वाद घालण्यास सुरुवात केली. अचानक असलेला प्रेक्षक आणि कर्णधारामध्ये चाललेला वाद पाहून संपूर्ण संघ गोंधळात पडला. काहीही कळण्याच्या आत त्या प्रेक्षकाने श्रीकांतवर चाकूहल्ला केला. वेळीच अंपायर आणि इतर खेळाडूंनी मध्यस्थी केल्याने भारतीय कर्णधाराला दुखापत झाली नाही. परंतु या घटनेने कपिल देव सह संपूर्ण संघ हादरला होता. वेळीच अंपायर आणि इतर खेळाडूंनी मध्यस्थी केल्याने भारतीय कर्णधाराला दुखापत झाली नाही. तसेच सुरक्षा रक्षकांनी सुद्धा त्या प्रेक्षकाला अटक केली. यानंतर भारत - पाकिस्तान यांच्यात कराची, फैसलाबाद, लाहोर आणि सियालकोट येथे आयोजित या मालिकेत भारताने ४ कसोटी सामने खेळले. ही ऐतिहासिक मालिका अनिर्णित राहिली आणि पाकिस्तानच्या भूमीवर पहिल्यांदाच कसोटी मालिकेत भारत अपराजित राहिला होता.