IND VS ENG Test : टीम इंडियाचा माजी टेस्ट कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) मे महिन्यात टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. सर्वांना असं वाटतं होतं की भारत - इंग्लंड (India VS England) यांच्यात होणाऱ्या 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजनंतर कदाचित दोघे टेस्टमधून निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतात. पण त्यापूर्वीच दोघांनी निवृत्ती घेतल्यामुळे त्याच्या फॅन्सना धक्का बसला. दोन्ही स्टार क्रिकेटर्सच्या अशा तडकाफडकी निवृत्तीनंतर अनेकांनी बीसीसीआयवर गंभीर आरोप लावले.
रोहित आणि विराटने अचानकपणे जाहीर केलेल्या निवृत्तीनंतर सोशल मीडियावर फॅन्स अनेक प्रश्न विचारू लागले. गौतम गंभीर आणि चीड सेलेक्टर अजीत आगरकर यांनी दोघांसोबत काही राजकारण केले का? किंवा बीसीसीआयनेच या खेळाडूंवर दबाव आणला का? असे प्रश्न उपस्थित होत होते. मात्र असं असताना आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी लंडनमध्ये एएनआयशी बोलताना या सर्व गोष्टींचे स्पष्टपणे खंडन केले.
मी ही गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी स्वतःच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयची धोरणं आहेत ज्यानुसार आम्ही कोणत्याही खेळाडूला निवृत्तीसाठी मजबूत करत नाही, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय होता, दोघे दिग्गज खेळाडू आहेत आणि अजूनही भारतासाठी वनडे फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध आहेत. दोघांना नेहमीच भारतीय क्रिकेटचे 'लिजेंडरी बॅटर्स' म्हणून ओळखले जाते.
विराटने आतापर्यंत क्रिकेटचे तीनही फॉरमॅट मध्ये एकूण 539 सामने खेळले आहेत. विराटने त्याच्या टेस्ट करिअरमध्ये 123 सामन्यांमध्ये एकूण 9230 धावा केल्या आहेत. यात त्याने 30 शतक, 7 द्विशतक आणि 31 अर्धशतक केली आहेत. त्याने 302 वनडे सामन्यात 51 शतकांसह 14181 धावा, टी20 मध्ये 1 शतकासह 4188 धावा केल्या आहेत.
हेही वाचा : किंग चार्ल्सने घेतली टीम इंडियाची भेट, पंतच्या अपघातासह लॉर्ड्समधील पराभवाबाबत केली चर्चा
विराटने निवृत्ती जाहीर करत असताना लिहिले की, 'टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदा मी पहिल्यांदा बॅगी ब्लू रंगाचा पोशाख घातला होता त्याला 14 वर्षे झाली. खरं सांगायचं तर, या फॉरमॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची मी कधीच कल्पनाच केली नव्हती. या फॉरमॅटने माझी खरी परीक्षा घेतली, मला घडवले आणि आयुष्यभर मी जे धडे सहन करेन असे धडे कसोटी क्रिकेटने शिकवले. पांढऱ्या रंगाच्या जर्सीत क्रिकेट खेळण्यात काहीतरी खास खोलवर रुझलेले वैयक्तिक गुण असतात. शांतपणे खेळणे, लांबलचक दिवस, छोटे छोटे पण महत्त्वाचे क्षण जे कोणीही पाहत नाही पण ते कायम तुमच्यासोबत राहतात. मी या फॉरमॅटमधून बाहेर पडतोय, हे सोपे नाही - पण हेच मला आता योग्य वाटत आहे. मी माझ्याकडे जे होते ते सर्व काही दिले आहे आणि त्याने मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त परत दिले आहे. मी कृतज्ञतेनं अन् भरल्या मनाने निघून जातोय ते या खेळासाठी, मी ज्या लोकांसोबत मैदान शेअर केले त्यांच्यासाठी आणि वाटेत मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी. मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसतमुखाने पाहत राहीन याची मला खात्री आहे'.
टीम इंडियाचा टेस्ट संघाचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माची कारकीर्द अतिशय उत्तम ठरली. त्याने 67 टेस्ट सामने खेळताना 4302 धावा केल्या. दरम्यान त्याने 18 अर्धशतकं, 12 शतकं तर 1 द्विशतक सुद्धा लगावलं. या दरम्यान त्याने गोलंदाजी करताना 2 विकेट सुद्धा घेतल्या आहेत. 2013 रोजी इडन गार्डन स्टेडियमवर वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने टीम इंडियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर त्याचा शेवटचा टेस्ट सामना त्याने 26 डिसेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान खेळला.
आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेत असताना रोहित शर्माने आपल्या चाहत्यांसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली. यात तो म्हणाला की, 'सर्वांना नमस्कार, मी फक्त एवढेच सांगू इच्छितो की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. पांढऱ्या रंगात माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा एक महत्वाचा सन्मान राहिलाय.गेल्या काही वर्षांपासून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मी वनडे क्रिकेट फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळत राहीन'.