Ravi Shastri Big Statement On Shubman Gill: टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी सध्या टेस्ट संघाचं नेतृत्व करणाऱ्या शुभमन गिलबाबत एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी थेट चर्चेला कारणीभूत ठरणारं वक्तव्य केलं आहे. शास्त्रींच्या म्हणण्यानुसार, जर पुढील काही वर्षांत शुभमन गिलने अपेक्षेप्रमाणे प्रगती केली नाही, तर ते खरोखरच धक्कादायक, आश्चर्यकारक असेल.
इंग्लंडविरुद्ध लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारताला 5 गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. नव्यानेच शुभमन हा संघाचा कर्णधार झाला होता. त्यामुळे पहिल्या पराभवाने तो दबावात आल्याचे दिसून आपले. त्यामुळे आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी 2 जुलै रोजी बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानावर खेळली जाणार आहे. भारतीय वेळेनुसार ही कसोटी दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. सध्या भारत 5 कसोट्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे दुसरी कसोटी जिंकून मालिकेत पुनरागमन करण्यासाठी टीम इंडिया जोरदार तयारी करत आहे.
रवी शास्त्रींनी विजडन या प्रसिद्ध क्रिकेट पोर्टलशी बोलताना सांगितलं, “जर गिल पुढच्या काही वर्षांत मोठं यश मिळवू शकला नाही, तर मी खूप निराश होईन. जेव्हा तो फलंदाजी करतो, तेव्हा त्याच्यात एक ‘रॉयल टच’ असतो. त्याने जर परिस्थितीशी जुळवून घेतलं आणि अनुभवातून शिकत गेला, तर भविष्यात तो एक मोठं नाव होऊ शकतो.”
शास्त्री पुढे म्हणाले, “गिल आता खूप प्रगल्भ झाला आहे. तो प्रेस कॉन्फरन्समध्ये जसं बोलतो, टॉसवेळी जशी मॅच्युरिटी दाखवतो, हे पाहून छान वाटतं. त्याला पुढची तीन वर्ष सलग टीमसोबत ठेवा, मालिकेच्या निकालांवर फार विचार करू नका. गिल सतत खेळत राहिला, तर तो भारतासाठी मोठं कामगिरी करू शकेल.”
दुसरी कसोटी 2 ते 6 जुलै दरम्यान बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानावर खेळली जाणार आहे. भारतासाठी ही कसोटी निर्णायक ठरणार आहे. बर्मिंघममध्ये भारताचा टेस्ट रेकॉर्ड अतिशय खराब आहे. गेल्या 58 वर्षांत भारत तिथे एकही कसोटी जिंकू शकलेला नाही. आजवर भारताने तिथे 9 कसोट्या खेळल्या असून, त्यातील 8 सामन्यांत पराभव झाला आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.