Rohit Sharma : टीम इंडियाच्या टेस्ट आणि वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. बुधवार 7 मे रोजी रोहितने इंस्टाग्राम स्टोरीवरून ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली असून त्याने यासोबतच भावनिक पोस्ट लिहिली आहे. यापूर्वी टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रोहितने टेस्ट आणि टी 20 क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो वनडे क्रिकेटमध्ये पुढील काळात खेळत राहणार अशी माहिती त्याने स्वतः दिलीये. मात्र आयपीएल 2025 सुरु असताना रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती का घेतली याबाबत मीडिया रिपोर्ट्समधून काही माहिती समोर आलीये.
आयपीएल सुरु असताना रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती का जाहीर केली? अशा प्रश्न अनेकांना पडलाय. मात्र इंडियन एक्सप्रेसने याबाबत दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्माच्या निवृत्तीचं कारण हे आगामी इंग्लंड दौरा असू शकतो. 20 जून पासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे. यासाठी संपूर्ण टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून यात टीम इंडियाचं नेतृत्व हे शुभमन गिलकडे सोपवण्याचा विचार बीसीसीआयचे सिलेक्टर्स करत आहेत.
रोहितला कर्णधारपदावरून हटवण्याचा निवड समितीचा निर्णय हा बदलाच्या गरजेमुळे किंवा वयस्कर खेळाडूंना वगळण्याच्या गरजेमुळे नव्हता, तर रोहितच्या कामगिरी आणि रेड-बॉल क्रिकेटमधील त्याच्या फॉर्मवर आधारित असल्याचे समजले जाते. त्यामुळे भारत विरुद्ध इंग्लंड दौऱ्यासाठी रोहित शर्माला टीम इंडियाच्या टेस्ट कर्णधारपदावरून बाजूला केले जाणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र त्यापूर्वीच रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. शुभमन गिल याने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली होती. आता त्याच्यावर टेस्ट संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. तर रोहित शर्मा हा टीम इंडियाचा वनडे संघाचा कर्णधार राहील.
आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेत असताना रोहित शर्माने आपल्या चाहत्यांसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली. यात तो म्हणाला की, 'सर्वांना नमस्कार, मी फक्त एवढेच सांगू इच्छितो की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. पांढऱ्या रंगात माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा एक महत्वाचा सन्मान राहिलाय.गेल्या काही वर्षांपासून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मी वनडे क्रिकेट फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळत राहीन'.
टीम इंडियाचा टेस्ट संघाचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माची कारकीर्द अतिशय उत्तम ठरली. त्याने 67 टेस्ट सामने खेळताना 4302 धावा केल्या. दरम्यान त्याने 18 अर्धशतकं, 12 शतकं तर 1 द्विशतक सुद्धा लगावलं. या दरम्यान त्याने गोलंदाजी करताना 2 विकेट सुद्धा घेतल्या आहेत. 2013 रोजी इडन गार्डन स्टेडियमवर वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने टीम इंडियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर त्याचा शेवटचा टेस्ट सामना त्याने 26 डिसेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान खेळला.