Sanjiv Goenka LSG Sacking Zaheer Khan: लखनऊ सुपर जायंट्सला (LSG) यंदाचं इंडियन प्रिमिअर लीगचं म्हणजेच आयपीएल 2025 चं पर्व निराशाजनकच गेलं. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली सातव्या स्थानावर राहून इंडियन प्रीमियर लीग हंगामातील त्यांच्या सर्वात वाईट कामगिरीची त्यांनी यंदा बरोबरी केली. लिलावात पंतला संघात घेण्यासाठी 27 कोटी रुपयांची मोठी रक्कम खर्च केल्यानंतरही, लखनऊला सातत्य पूर्ण कामगिरी करता आली नाही. लखनऊच्या संघाला एखाद्या सामन्यातच चमक दाखवता आली. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, अत्यंत सुमार कामगिरीसाठी लखनऊच्या संघाकडून अडचणीत येणारी व्यक्ती पंत किंवा मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर नाही. मालक संजवी गोएंका यांची पहिली वक्रदृष्टी मराठमोळा माजी क्रिकेटपटू झहीर खानवर पडली आहे. लखनऊच्या संघाचा मार्गदर्शक असलेल्या झहीरला संघ बाहेरचा रस्ता दाखवणार आहे.
लखनऊचे मालक संजीव गोएंका यांच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्स व्यवस्थापन समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये आयपीएल 2025 च्या हंगामानंतर जो संघ समोर आला आहे त्याने गोएंका फारसे प्रभावित झालेले नाहीत. त्यांना हा संघ फारचा चांगला रुचलेला नसल्याचं 'क्रिकबझ'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. याच अहवालात पुढे म्हटले आहे की, झहीरवर अधिक दबाव असून त्याला यंदाच्या हंगामापूर्वी एक वर्षाच्या करारावर मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. एलएसजीने त्यांच्या 14 सामन्यांमध्ये फक्त सहा विजय मिळवले. त्यातही या सामन्यांपैकी अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत कर्णधार पंत लय गवसण्यासाठी झगडताना दिसला.
झहीरबरोबर असलेला करार एलएसजीकडून पुन्हा केला जाईल की नाही याबद्दल शंका आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघ पुन्हा झहीरवर कोणतीही जबाबदारी देण्याची शक्यता कमी आहे. म्हणजेच हा करार पुन्हा होण्याची शक्यता अगदीच धूसर असून झहीरचा डच्चू देण्याचा संजीव गोएंकांच्या संघाचा विचार आहे.
मेगा लिलावापूर्वी मोठ्या प्रमाणात बदल करूनही संघाच्या पदरी निराशाच आली. संघाने केलेल्या मोठ्या बदलांमध्ये मूळ कर्णधार केएल राहुलला करामुक्त करण्याचाही समावेश होता. राहुलला करारमुक्त केल्यानंतरही फ्रँचायझीला मागील हंगामापेक्षा अधिक सुधारित कामगिरी करण्यात अपयश आलं. मागच्या पर्वापेक्षा यंदाच्या पर्वात लखनऊला एक विजय कमीच मिळाला.
संपूर्ण हंगामात, एलएसजीचा कर्णधार ऋषभ पंतनेही अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये ऐन वेळी कच खाल्ली आणि चाहत्यांबरोबर मालकांचीही निराशाच केली. अनेकदा मैदानावर कर्णधारपद भूषवताना आणि डगआउटमध्येही त्याने संयम गमावल्याचं दिसून आलं. एका प्रसंगी, तो झहीरशी वाद घालता दिसला. एका सामन्यात तो चक्क सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्यावरूनही मोठा वाद झाला होता.
झहीरच्या मार्गदर्शनासंदर्भात संघात असंतोष आहे. संघाचा दृष्टिकोन निश्चित करण्यात झहीरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली. मात्र त्यामधून संघाला साजेसे निकाल प्राप्त झाले नाहीत. हे झहीरचं अपयश मानलं जातं.
एलएसजीने भारतीय गोलंदाजी आक्रमण उभारण्यात झहीरनेही महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र याचाही संघाला फारसा फायदा झाला नाही. मयंक यादव, मोहसिन खान आणि आकाश दीप यांच्यासाठी फ्रँचायझीने एकूण 23 कोटी रुपये खर्च केले. परंतु या तिघांनी एकत्रितपणे फक्त आठ सामने खेळले.
लिलावात पंतला 27 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतल्यानंतर एलएसजीकडून खूप जास्त अपेक्षा होत्या. तथापि, पंतला फलंदाजी आतापर्यंतचं सर्वात वाईट पर्व हे यंदाचं ठरलं. पंतने 14 सामन्यांमध्ये फक्त 269 धावा केल्या, त्यापैकी 118 धावा त्याने शेवटच्या लीग सामन्यात केल्या.