Shoaib Bashir Bowling: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय. बीसीसीआयने 24 मे 2025 रोजी मुंबईत पत्रकार परिषदेत 18 सदस्यीय संघाची घोषणा केली. 20 जूनपासून सुरू होणारा हा दौरा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 सायकलमधील भारताचा पहिला टेस्ट दौरा असेल. नवीन कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीमसाठी इंग्लंडचा हा दौरा आव्हानात्मक असेल. कारण रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर टीममधील बहुतेक खेळाडूंना तेवढा अनुभव नाही.
5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला येण्यापूर्वीच एका तरुण इंग्लंड बॉलरने आपल्या धोकादायक गोलंदाजीने टीम इंडियाला इशारा दिलाय. या बॉलरने इंग्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यातील अलिकडच्या सामन्यात हा भीम पराक्रम करुन दाखवलाय. त्याने आपल्या घातक गोलंदाजीने कहर केलाय. जो बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील टीमने अवघ्या अडीच दिवसांत जिंकला.
या सामन्यात इंग्लंडने झिम्बाब्वेचा एक डाव आणि 45 धावांनी पराभव केला आणि तेही अवघ्या अडीच दिवसांत जिंकला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने झॅक क्रॉली, बेन डकेट आणि ऑली पोप यांच्या शतकांसह 565 धावांचा प्रचंड आकडा उभारला. झिम्बाब्वेची टीम दोन्ही डावात इंग्लंडच्या धावसंख्येच्या जवळपासही पोहोचू शकली नाही. या शानदार विजयामुळे भारताविरुद्धच्या आगामी मोठ्या मालिकेपूर्वी इंग्लंडचा आत्मविश्वास वाढलाय.
खरं तर इंग्लंडचा तरुण ऑफ-स्पिनर शोएब बशीरने झिम्बाब्वेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात शानदार कामगिरी करत एकूण 9 बळी घेतले. ज्यामुळे भारताच्या आगामी इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला इशारा मिळालाय. नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज येथे खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात 21 वर्षीय शोएब बशीरने आपल्या फिरकी गोलंदाजीने झिम्बाब्वेच्या फलंदाजांना अडचणीत आणले. त्यांना सावरण्याची संधींच दिली नाही. त्याने सामन्याच्या पहिल्या डावात 3 विकेट्स घेतल्या आणि दुसऱ्या डावात धुमाकूळ घातला. त्याने 6 विकेट्स घेत झिम्बाब्वेची फलंदाजी पूर्णपणे उद्ध्वस्त केली. अशाप्रकारे त्याने सामन्यात एकूण 143 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. ही त्याची कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
भारताच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान भारतीय फलंदाजांना स्विंग तसेच फिरकी गोलंदाजांचा सामना करावा लागेल. बशीरसारखे तरुण फिरकीपटू जे इंग्लंडच्या पिचवर प्रभाव पाडू शकतात ते भारतीय फलंदाजांसाठी एक नवीन आव्हान निर्माण करू शकतात. टीम इंडियात अनेक तरुण फलंदाज असल्याने त्यांना अशा उदयोन्मुख फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी तयार राहावे लागेल. ही कामगिरी भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी एक महत्त्वाचा संदेश आहे की इंग्लंडकडे केवळ वेगवान गोलंदाजच नाहीत तर तरुण आणि प्रभावी फिरकीपटू देखील आहेत.
शोएब बशीरने वयाच्या 20 व्या वर्षी भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले. 2024 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतही बशीरने आपल्या शानदार कामगिरीने प्रभावित केले. कसोटी मालिकेतील दुसरा सामना (विशाखापट्टणममधील) बशीरचा पहिला कसोटी सामना होता. त्याने त्याच्या पदार्पणाच्या कसोटीत 4 बळी घेऊन लक्ष वेधून घेतले. यानंतर त्याने रांची येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीत शानदार कामगिरी केली आणि 5 बळी घेतले, जे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले 5 बळी देखील आहेत. त्या सामन्यात त्याने यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि रजत पाटीदार असे मोठे विकेट्स घेतले. एवढेच नव्हे तर त्याने धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या या मालिकेतील शेवटच्या सामन्यात 5 विकेट्सही घेतल्या. आता घरच्या मैदानावर झिम्बाब्वेविरुद्धच्या त्याच्या शानदार गोलंदाजीनंतर तो टीम इंडियाच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरेल ही गोष्ट स्पष्ट झालीय.
शोएबने आतापर्यंत एकूण 16 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने एकूण 58 विकेट्स घेतल्या. त्याची गोलंदाजीची सरासरी 36.39 आहे. बशीरने कसोटी क्रिकेटमध्ये चार वेळा एका डावात 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्यायत. त्याची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी अलीकडेच झिम्बाब्वेविरुद्ध झाली, जिथे त्याने एका डावात 6 बळी घेतले (6/81). झिम्बाब्वेविरुद्धच्या त्याच सामन्यात त्याने एकूण 9 विकेट्स (9/143) घेतल्या. जी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम सामन्यातील कामगिरी आहे. त्याच सामन्यात त्याने आपले 50 कसोटी बळी पूर्ण केले. ज्यामुळे तो इंग्लंडसाठी हा पराक्रम करणारा सर्वात तरुण गोलंदाज ठरला. विशेष म्हणजे त्याने वयाच्या 21 व्या वर्षी ही कामगिरी केली.