Yograj Singh defends Gambhir: भारताचे माजी क्रिकेटर आणि युवराज सिंह यांचे वडील योगराज सिंह नेहमीच भारतीय क्रिकेट संघ आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या गोष्टींवर भाष्य करत असतात. आकडेच त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर होणाऱ्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की गंभीरवर शंका घेण्याचं काहीही कारण नाही, कारण संघ चांगलं प्रदर्शन करत आहे आणि प्रगतीच्या मार्गावर आहे.
बर्मिंघममध्ये भारताने 336 धावांनी मोठा विजय मिळवल्यानंतर गंभीरवरची टीका काहीशी कमी झाली आहे. लीड्समधील पराभवानंतर अनेकांनी गंभीरच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मात्र योगराज सिंह यांना वाटतं की अशा प्रकारची टीका योग्य नाही. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी सांगितलं, "संघ चांगलं खेळतो आहे. खेळाडूंच्या निवडीवर, त्यांच्या क्षमतेवर किंवा कामगिरीवर उगाच टीका करणं चुकीचं आहे. तुम्ही म्हणता की त्याला संघातून काढा, तो लायक नाही... असं काहीही बोलू नये."
हे ही वाचा: तिसऱ्या टेस्टमध्ये बुमराहला मिळणार संधी? जाणून घ्या IND vs ENG 3rd Test Lord's ची संभाव्य प्लेइंग 11
योगराज यांनी ठामपणे सांगितलं की, "गौतम गंभीरबद्दल काहीही बोलू नये. तो उत्कृष्ट काम करत आहे. युवराज सिंह, राहुल द्रविड़, गंभीर हे सगळे खेळाला काहीतरी परत देण्याचा प्रयत्न करत आहेत. क्रिकेटने त्यांना खूप काही दिलं आहे, आणि आता ते त्याच खेळासाठी योगदान देत आहेत." ते पुढे म्हणाले की, "समजा भारत एखादी मालिका हरला तरी, आपण म्हणायला हवं की या तरुणांनी चांगलं खेळ दाखवलं, जिंकणं-हरणं हा खेळाचा भाग आहे. पण आजकाल आपण फक्त निकाल पाहतो. हरलो की टीका, जिंकलो तर सगळं माफ! हे बरोबर नाही."
हे ही वाचा: Video: सामना जिंकल्यावर कर्णधार शुभमन गिल घेतोय 'या' व्यक्तीचा शोध, कोण हरवलं आहे? जाणून घ्या
योगराज सिंह यांनी टीम इंडिया कॅप्टन शुभमन गिलचंही कौतुक केलं. " मी असाच खेळत राहीन हे त्याचं आत्मविश्वासपूर्ण वक्तव्य मला आवडला. ही टीम छान खेळते आहे. सर्वांनी त्यांचं कौतुक केलं आणि मला खात्री आहे, ही टीम ही मालिका जिंकणार आहे."
एजबेस्टन कसोटीत भारताच्या फील्डिंगचंही त्यांनी विशेष कौतुक केलं. "चांगले झेल, अचूक थ्रो, आणि गोलंदाजांची सातत्यपूर्ण टाकलेली चेंडू यामुळेच भारताला मोठा विजय मिळाला," असं ते म्हणाले.
लॉर्ड्स टेस्टसाठी भारतीय संघ आता छोटा ब्रेक घेणार असून 10 जुलैपासून सुरू होणाऱ्या सामन्याची तयारी करत आहे. योगराज सिंह यांचा विश्वास आहे की शुभमनच्या नेतृत्वात ही टीम मालिकाही जिंकू शकते.