आयपीएल 2025 मधील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PKBS) यांच्यात पार पडला. या सामन्यात अम्पायर्सनी विराट कोहलीच्या धोकादायक धावेकडे दुर्लक्ष केल्याने माजी क्रिकेटर आणि समालोचक सुनील गावसकर यांनी संताप व्यक्त केला. 12 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर विराट कोहली दोन धावा काढताना खेळपट्टीवरुन धावला. सुनील गावसकर यावेळी समालोचन करत होते. त्यांनी विराट कोहलीला समज का देण्यात आली नाही याबद्दल विचारणा केली. यामुळे खेळपट्टीचं नुकसान होण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात पंजाबने टॉस जिंकल्यानंतर आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. बंगळुरुच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्यात अपयश येत असताना, विराट कोहली एक, दोन धावा काढत धावसंख्या वाढत राहील याची काळजी घेत होता. 12 व्या ओव्हरला विराट कोहलीने दोन धावांसाठी फटका लगावला. लिव्हिंग्टोननेही सहजपणे दोन धाव काढल्या.
यावेळी समालोचन करणारे सुनील गावसकर यांनी विराट कोहली खेळपट्टीवरुन धावल्याचं लक्षात आणून दिलं. खेळपट्टीला होणाऱ्या संभाव्य नुकसानामुळे हे टाळलं जातं. "कोहली विकेट दरम्यान जलद धावतो. चेंडू टोलवताच त्याला दोन धावा काढायच्या हे लक्षात आलं होतं," असं गावसकर म्हणाले. "कोणताही अम्पायर त्याला कधीही सांगणार नाही. तो पुन्हा खेळपट्टीवर सरळ धावत आहे. पंजाब किंग्ज यानंतर फलंदाजी करणार आहे," असं ते पुढे म्हणाले.
अम्पायर्सनी हस्तक्षेप केला नसला, तरी गावसकर यांच्या विधानामुळे मोठ्या खेळाडूंना कधीकधी अशा कृतींपासून सुटका मिळते का यावर चर्चा रंगली आहे. दरम्यान सामन्यात विराट कोहलीच्या फलंदाजीनेही अनेकांच्या भुवया उंचावल्या. या हंगामात चांगल्या स्ट्राईक रेटसाठी ओळखल्या जाणाऱ्या विराटने संथ फलंदाजी केली. मोठे मोठे शॉट्स खेळण्याऐवजी, त्याने स्ट्राईक रोटेट करण्यावर आणि फिल साल्ट आणि रजत पाटीदार सारख्या पॉवर-हिटर्सना फलंदाजी देण्यावर लक्ष वेधलं.
ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने विराच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केलं होतं. "येथे 200 धावा हा फक्त एक सामान्य धावसंख्या आहे," असं सांगताना कोहलीने अधिक आक्रमक खेळी करायला हवी होती असं मत व्यक्त केलं. अखेर कोहली 15 व्या ओव्हरला 35 चेंडूत 43 धावा करत बाद झाला.
आरबीसीने अंतिम सामन्यात पंजाबचा पराभव करत पहिल्यांदा आयपीएलच्या जेतेपदावर आपलं नाव कोरलं. आयपीएलच्या अंतिम सामन्यातील विजयासह आरसीबीने तीन सामन्यांच्या पराभवाचा नकोसा रेकॉर्डही संपवला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर कृणाल पंड्याने केलेल्या उत्तम गोलंदाजीमुळे बंगळुरुला अंतिम सामना जिंकता आला.
2008 मध्ये आरसीबीमध्ये सामील झाल्यापासून विराट कोहलीला त्याच्या पहिल्या आयपीएल ट्रॉफीची चवही चाखता आली. कोहलीने 15 सामन्यांमध्ये 657 धावा करून आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणूनही स्थान मिळवले.