T20 Mumbai League : आयपीएल 2025 च्या फायनल सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील पंजाब किंग्सला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर काहीच दिवसांनी टी 20 मुंबई लीगमध्ये झालेल्या फायनल सामन्यात श्रेयस सोबो मुंबई फाल्कन्सचं नेतृत्व करत होता, मात्र त्यात सुद्धा अय्यरच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. 12 जूनला वानखेडे स्टेडियमवर झालेल्या फायनल सामन्यात मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्सने श्रेयसच्या (Shreyas Iyer) सोबो मुंबई फाल्कन्सचा पराभव केला.
फायनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वातील संघाचा पराभव झाल्याने आयपीएल फायनलमधील पराभवाची श्रेयस अय्यरची जखम ताजी झाली. जे अहमदाबाद मध्ये झालं होतं, मुंबईमध्येही असंच झालं. विजयासाठी 158 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना सिद्धेश लाडच्या नेतृत्वातील साउथ सेंट्रल संघाने 19.2 ओव्हरमध्येच हा सामना जिंकला आणि टी 20 मुंबई लीगच्या विजेतेपदाची ट्रॉफी आपल्या नावावर केली. यावेळी लीगचा एंबेसडर भारताचा वनडे कर्णधार रोहित शर्मा सुद्धा उपस्थित होता.
हेही वाचा : पहिल्या टीम मीटिंगमध्ये गौतम गंभीरने विराट आणि रोहितचं नाव का घेतले? कारण जाणून तुम्हीही व्हाल इमोशनल
श्रेयस अय्यरने सामन्यानंतर सांगितले की, 'हे खूप थकवणारे आहे. विशेषतः जेव्हा तुम्ही हरता तेव्हा ते तुमच्या मनात खूप काही गोष्टी चालू असतात. मी कोणत्या खास गोष्टीवर चर्चा करू इच्छित नाही. माझ्या संघातील खेळाडूंनी सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केलं आहे. आम्ही फायनलमध्ये पोहोचेपर्यंत फक्त एक सामना हरलो. हा एक असा सामना होता जिथे तुम्ही कोणत्या एकाला दोष देऊ शकत नाही. हे पाठीत खंजीर खुपसण्यासारखं आहे आणि ते मला आवडत नाही. मी यातून खूप काही शिकलोय'.
'फायनलमध्ये पराभूत झाल्यावर ते निराश झाले असतील जे सामान्य आहे. त्याला दुःख झालं असेल. परंतू जेव्हा ते पुढील वर्षी परत येतील तेव्हा त्यांच्याकडे अतिरिक्त प्रेरणा आणि आत्मविश्वास असेल. या संघाला त्यांच्या प्रयत्नांवर गर्व असायला हवा'.
टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय करताना मुंबई साउथ सेंट्रलने पॉवर प्लेमध्ये ओपनर अंगक्रिश रघुवंशी आणि ईशान मुलचंदानीला बाद केलं. आयपीएल 2025 फायनल प्रमाणे या फायनलमध्ये सुद्धा कर्णधार श्रेयस अय्यर काही खास करू शकला नाही. मयुरेश टंडेलने 32 बॉलमध्ये 50 धावा केल्या. हर्ष अघवने 28 बॉलमध्ये 45 धावा केल्या. सोबो मुंबई फाल्कन्सने 157 धावा केल्या. वैभव माळी हा मुंबई साउथ सेंट्रलचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 4 ओव्हरमध्ये 2 विकेट घेतले. विजयाचं आव्हान पूर्ण करताना सिद्धेश लाड आणि ओपनिंग पार्टनर साहिल भगवंत जाधव या दोघांनी 2.5 ओव्हरमध्ये 32 धावा केल्या. मग सिद्धेश 15 धावांवर आणि साहिल 22 धावांवर बाद झाला. चिन्मय सुतारने 49 बॉलमध्ये 53 धावा केल्या आणि अवैस नौशाद खानने 38 धावा केल्या. सिद्धेश लाडच्या नेतृत्वातील साउथ सेंट्रल संघाने 19.2 ओव्हरमध्येच हा सामना जिंकला.