New Team Captain for ODI: इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. विशेषतः कर्णधारपदावर बदल होण्याची शक्यता आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात भारत बांग्लादेश दौऱ्यावर जाऊन वनडे आणि T20 मालिका खेळण्याची शक्यता आहे. त्यासाठी संघात काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, तर काही मुख्य खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते अशी माहिती समोर येत आहे.
सध्या टीम इंडिया इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत व्यस्त आहे. या मालिकेचं नेतृत्व शुभमन गिल करत आहेत. ही मालिका ४ ऑगस्टपर्यंत संपेल, त्यानंतर भारत बांग्लादेश दौऱ्यावर जाऊ शकतो. या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन T20 सामने खेळले जाणार आहेत. सुरुवातीला दोन्ही देशांमध्ये राजनैतिक कारणांमुळे दौरा रद्द होण्याची शक्यता होती, पण सध्या कोणतीही अधिकृत सूचना सरकारकडून न आल्याने दौरा होण्याची शक्यता वाढली आहे.
भारत आणि बांग्लादेश यांच्यात १७ ऑगस्टपासून वनडे मालिका सुरू होऊ शकते. जर दौरा झाला, तर विराट कोहली आणि रोहित शर्मा वनडेत पुनरागमन करू शकतात. रोहित शर्मा पुन्हा वनडे संघाचे नेतृत्व करू शकतो. मात्र T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा सहभाग निश्चित नाही, कारण अलीकडेच त्याची हर्नियाची शस्त्रक्रिया झाली असून तो सध्या विश्रांती घेत रिकव्हरी करत आहे.
BCCIच्या सूत्रांनुसार दौरा अद्याप यथास्थित आहे आणि रद्दबातल करण्याबाबत कुठलीही अधिकृत चर्चा झाली नाही. जर परिस्थिती बदलली, तर त्यानुसार निर्णय घेतला जाईल. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) एप्रिल महिन्यातच या मालिकेचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार, वनडे मालिका १७ ऑगस्टपासून मीरपूरमध्ये सुरू होईल आणि शेवटचा सामना २३ ऑगस्टला चटगावमध्ये खेळवला जाईल. T20 मालिका २६ ऑगस्टपासून सुरू होऊन ३१ ऑगस्टला संपेल. शुभमन गिलला या दौऱ्यात विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे T20 संघाचं नेतृत्व अक्षर पटेलकडे सोपवण्यात येऊ शकतं, असा अंदाज वर्तवला जातोय.
भारताने कधीही बांग्लादेशात T20 मालिका खेळलेली नाही, त्यामुळे ही मालिका ऐतिहासिक ठरणार आहे. भारताने अलीकडेच बांग्लादेशविरुद्ध घरच्या मैदानावर ३-० ने मालिका जिंकली होती.