India vs England 2nd Test: भारतीय संघात अनेक नवीन चेहरे, नवीन नेतृत्त्व अशात टीम इंडियाने मोठी कामगिरी करून दाखवली आहे.टेस्टच्या पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यावर अखेरीस भारताने विजय मिळवला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अशक्य वाटणारा इतिहास रचत इंग्लंडला एजबेस्टनच्या मैदानावर पहिल्यांदाच पराभूत केलं आहे. या विजयासह भारताने दुसऱ्या टेस्ट सामन्यात 336 धावांनी दणदणीत यश मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर भारताने याआधी 8 टेस्ट सामने खेळले होते, मात्र एकदाही विजय मिळवता आला नव्हता. पण या वेळी गिलच्या नेतृत्वाखाली संघाने जोरदार खेळ करत इतिहास बदलला आहे.
दुसऱ्या डावात भारतीय वेगवान गोलंदाज आकाश दीपने आपल्या पहिल्याच पाच विकेट्स घेतल्या. त्यांनी इंग्लंडच्या फलंदाजांचा अक्षरशः धुव्वा उडवला. इंग्लंडकडून जेमी स्मिथने सर्वाधिक 88 धावा केल्या, तर कॅप्टन बेन स्टोक्स 33 धावांवर बाद झाला. आकाश दीपशिवाय मोहम्मद सिराजनेही 5 विकेट्स घेत मोठा हातभार लावला.
भारताने पहिल्या डावात 587 धावा केल्या. शुभमन गिलने 269 धावा करत डबल सेंच्युरी ठोकली. त्याच्या शतकी खेळीबरोबरच यशस्वी जायस्वाल (87), रवींद्र जडेजा (89) आणि वॉशिंग्टन सुंदर (42) यांचाही मोठा वाटा होता.
कर्णधार गिलकडून दुसऱ्या डावातही भारताची धावांची आतषबाजी सुरूच राहिली. त्याने 161 धावांची दमदार खेळी केली. त्याला केएल राहुल (55), ऋषभ पंत (65) आणि जडेजा (69) यांची भक्कम साथ मिळाली. भारताने दुसरा डाव 427 धावांवर घोषित केला.
A historic win at Edgbaston #TeamIndia win the second Test by 336 runs and level the series 1-1
— BCCI (@BCCI) July 6, 2025
Scorecard https://t.co/Oxhg97g4BF #ENGvIND pic.twitter.com/UsjmXFspBE
या विजयामुळे भारताने टेस्ट क्रिकेटमधील सर्वात मोठा (धावांनी) विजय नोंदवला आहे. एजबेस्टनवरील पहिल्या विजयामुळे शुभमन गिल हा तिथे टेस्ट सामना जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.