Virat Kohli Test Retirement : भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली याने टी 20 क्रिकेटनंतर आता टेस्ट क्रिकेटमधून सुद्धा निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. विराट कोहलीने 12 मे रोजी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. विराटच्या या निर्णयानंतर त्याच्या फॅन्सना धक्का बसला असून विराटने अजून काही वर्ष टेस्ट क्रिकेटमध्ये खेळायला हवे होते अशी प्रतिक्रिया अनेकजण व्यक्त करतायत. दरम्यान विराटच्या निवृत्तीवर त्याच्या मोठा भाऊ विकास आणि बहीण भावना यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.
विराट कोहलीचा मोठा भाऊ विकास कोहली याने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करून लिहिले की, 'किती अविश्वसनीय प्रवास राहिलाय तुझा विराट. तू खेळासाठी जे केलंयस ते कधीही बदलता येणार नाही. तुझा आम्हाला नेहमीच अभिमान आहे'. विराट कोहलीचा भाऊ विकास हा विराटच्या बिझनेसमध्ये सुद्धा त्याची मदत करतो. तसेच विराट भारतासाठी क्रिकेट खेळत असताना त्याची व्यावहारिक बाजू सुद्धा तो सक्षमपणे सांभाळतो.
विराट कोहलीची मोठी बहीण भावना हिने सुद्धा सोशल मीडियावर विराटच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली. तिने विराटचा फोटो शेअर करून लिहिले की, ' अभिमान बाळगण्याचा प्रवास, कठोर परिश्रम, भावना, कठीण काळ आणि भरपूर कौतुकाचा प्रवास, असा प्रवास जो आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आदराने भरून टाकतो, तू खरोखरच सर्व कौतुकास पात्र आहेस विराट'.
हेही वाचा : विराट कोहली का पितो Black Water? या महागड्या पाण्याच्या एका बॉटलची किंमत ऐकून धक्का बसेल
विराटने निवृत्ती जाहीर करत असताना लिहिले की, 'टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदा मी पहिल्यांदा बॅगी ब्लू रंगाचा पोशाख घातला होता त्याला 14 वर्षे झाली. खरं सांगायचं तर, या फॉरमॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची मी कधीच कल्पनाच केली नव्हती. या फॉरमॅटने माझी खरी परीक्षा घेतली, मला घडवले आणि आयुष्यभर मी जे धडे सहन करेन असे धडे कसोटी क्रिकेटने शिकवले. पांढऱ्या रंगाच्या जर्सीत क्रिकेट खेळण्यात काहीतरी खास खोलवर रुझलेले वैयक्तिक गुण असतात. शांतपणे खेळणे, लांबलचक दिवस, छोटे छोटे पण महत्त्वाचे क्षण जे कोणीही पाहत नाही पण ते कायम तुमच्यासोबत राहतात. मी या फॉरमॅटमधून बाहेर पडतोय, हे सोपे नाही - पण हेच मला आता योग्य वाटत आहे. मी माझ्याकडे जे होते ते सर्व काही दिले आहे आणि त्याने मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त परत दिले आहे. मी कृतज्ञतेनं अन् भरल्या मनाने निघून जातोय ते या खेळासाठी, मी ज्या लोकांसोबत मैदान शेअर केले त्यांच्यासाठी आणि वाटेत मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी. मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसतमुखाने पाहत राहीन याची मला खात्री आहे'.
विराटने आतापर्यंत क्रिकेटचे तीनही फॉरमॅट मध्ये एकूण 539 सामने खेळले आहेत. विराटने त्याच्या टेस्ट करिअरमध्ये 123 सामन्यांमध्ये एकूण 9230 धावा केल्या आहेत. यात त्याने 30 शतक, 7 द्विशतक आणि 31 अर्धशतक केली आहेत. त्याने 302 वनडे सामन्यात 51 शतकांसह 14181 धावा, टी20 मध्ये 1 शतकासह 4188 धावा केल्या आहेत.