IND vs ENG Playing XI Jasprit Bumrah: आज 2 जुलै रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅममध्ये सुरू झाला आहे. या वेळी प्लेइंग 11 मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. आजच्या सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेल्या बुमराहऐवजी युवा गोलंदाज आकाशदीपला प्लेइंग-11 मध्ये स्थान देण्यात आलं आहे. जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याबाबत कर्णधार शुभमन गिलने महत्त्वाचं विधान केलं आहे.
टॉस गमावल्यानंतर बोलताना गिल म्हणाला, "आमच्या संघात तीन बदल झाले आहेत. नितीश रेड्डी, वॉशिंगटन सुंदर आणि आकाशदीप यांना संधी मिळाली आहे. जसप्रीत बुमराह आजचा सामना खेळत नाहीये आणि त्यामागचं कारण वर्कलोड मॅनेजमेंट आहे. आम्हाला यानंतर चांगला विश्रांतीचा काळ मिळणार आहे आणि लॉर्ड्सवरील तिसऱ्या कसोटीमध्ये त्याचा प्रभावी वापर करता येईल."
गिलने कुलदीप यादवला न खेळवण्यामागचं कारणही स्पष्ट केलं. संघाने मुख्य फिरकीपटू म्हणून कुलदीपऐवजी ऑलराउंडर वॉशिंगटन सुंदरवर विश्वास दाखवला आहे. यावर गिल म्हणाला, "आम्ही कुलदीपला अंतिम-11 मध्ये घेण्याचा विचार केला होता. मात्र, मागील सामन्यात आमचं लोअर ऑर्डर बॅटिंग फारसं टिकू शकलं नाही, त्यामुळे यावेळी फलंदाजीची खोली वाढवण्यासाठी सुंदरचा समावेश करण्यात आला आहे."
हे ही वाचा: वेस्टइंडीज क्रिकेटरवर 11 महिलांच्या बलात्काराचा आरोप; मुख्य प्रशिक्षक म्हणाले, ' मी जज नाही. पण...'
पहिला कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर खेळला गेला होता. त्या सामन्यात भारताने दोन्ही डावांमध्ये एकूण पाच शतकी खेळी करत इंग्लंडसमोर 371 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, भारतीय गोलंदाजीतील अपयश आणि फील्डिंगमधील त्रुटीमुळे इंग्लंडने ते लक्ष्य सहज पार केलं आणि भारताला 0-1 ने पिछाडीवर जावं लागलं.