2011 चा एकदिवसीय वर्ल्डकप जिंकल्यानंतर पुढील दोन वर्षात भारतीय संघात फार मोठे बदल झाले. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत 0-4 ने व्हाईटवॉश मिळाल्यानंतर टप्याटप्याने भारताच्या दिग्गज खेळाडूंना संघातून वगळण्यात आलं होतं. निवडकर्त्यांनी तर महेंद्रसिंग धोनीलाही कर्णधारपदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी भारतीय संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू मोहिंदर अमरनाथ निवड समितीचा भाग होते. त्याबद्दल बोलताना युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी अमरनाथ आणि इतरांवर जोरदार टीका केली आहे.
"तुम्ही (बीसीसीआय निवडकर्ते) काही कारण नसताना या मुलांनचं करिअर उद्ध्वस्त केलं. गौतम गंभीर, युवराज सिंग, हरभजन सिंग, झहीर खान, मोहम्मद कैफ, व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड यांना फटका बसला. तुम्ही 2011 नंतर त्यांना जाऊ दिलं," असं योगराज सिंग यांनी InsideSport शी संवाद साधताना म्हटलं.
"तुम्ही 2011 वर्ल्डकपनंतर संघाला बर्बाद केलं. तुम्ही 7 खेळाडूंचं करिअर गटारात घातलं. त्यामुळे ते संघर्ष करत होते," असं योगराज म्हणाले आहेत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या मालिका पराभवांमुळे गंभीर, युवराज, झहीर आणि हरभजनसारखे खेळाडू राष्ट्रीय संघातून दूर झाले. दुसरीकडे, द्रविड आणि लक्ष्मण यांनी त्यांच्या गौरवशाली कसोटी कारकिर्दीतून निवृत्ती मागितली.
2011 च्या विश्वचषक विजेत्या संघातील महत्त्वाचे सदस्य असूनही, 2015 चा विश्वचषक आला तेव्हा गंभीर, युवराज, झहीर आणि हरभजन हे सर्व एकदिवसीय संघातून पूर्णपणे बाहेर पडले होते. त्यावेळी त्या खेळाडूंना आणि त्यांच्या कारकिर्दीला चुकीच्या पद्धतीने हाताळल्याबद्दल योगराज यांनी अमरनाथ यांच्यावर टीका केली.
"धोनी कर्णधार असताना आपण पाच मालिका गमावल्या. मोहिंदर अमरनाथ यांनी त्याला कर्णधारपदावरुन काढलं जाईल असं सांगितलं. पण तसं करण्याचा हा मार्ग नाही," असं योगराज म्हणाले. अमरनाथ यांनी व्हाईटवॉशनंतर धोनीला कर्णधारपदावरून हटवण्याची तयारी आहे असं सांगितलं होतं. परंतु बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी त्यांना रोखलं होतं.
"जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा आदर करता तेव्हा तुम्ही प्रश्न विचारत नाही. पण माझा प्रश्न असा आहे की, जर तुमच्याकडे निवड समिती आहे जी भारतीय क्रिकेटसाठी काय चांगले आहे याचा विचार करते, तर त्यांना मोकळीक का दिली जात नाही?", असंअमरनाथ यांनी 2012 मध्ये सीएनएन-आयबीएनला सांगितलं होतं. बीसीसीआयच्या निवड समितीमध्ये अमरनाथ यांचा कार्यकाळ फक्त एक वर्ष टिकला.
यानंतर धोनी 2014 मध्ये निवृत्त होईपर्यंत कसोटी संघाचे नेतृत्व करत राहिला. टी-20 मध्ये त्याचा कर्णधारपदाचा कार्यकाळ जानेवारी 2017 पर्यंत होता, त्यानंतर विराट कोहलीकडे जबाबदारी सोपवण्यात आली.