Ambernath News : अंबरनाथमधील जावसई परिसरातील वाघवाडीत एक धक्कादायक घटना घडलीय. या परिसरातील तुषार लोंढे आणि अक्षय वाघचौरे हे या ठिकाणी राहतात. या दोघांच्याही घरी गाई आहेत. सकाळी दोघांनी गाईंना चरण्यासाठी सोडलं होतं. त्यानंतर रात्री 8 वाजताच्या सुमारास तुषार लोंढे हे त्यांच्या गाईंना परत आणण्यासाठी गेले असता त्यांना त्यांच्या 3 गायी सापडल्या नाहीत. गाई सापडत नसल्यामुळे दोघांनी त्या परिसरात शोधाशोध सुरु केली. त्यावेळी त्या परिसरात 3 व्यक्ती अक्षय वाघचौरे यांच्या एका गाईला ब्रेड खाऊ घालत असल्याचं त्यांना दिसलं.
त्यानंतर त्यांनी लगेच अक्षय वाघचौरे यांना फोन त्या ठिकाणी बोलावलं. हे समजताच गाई चोरण्यासाठी आलेले तिघेही तिथून पळून गेले. त्यानंतर ते त्यांच्या गाई जवळ आले तर गाई बेशुद्ध पडलेली होती. गाईला गुंगीचं औषध देऊन गाई चोरण्याचा त्यांचा डाव असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी लगेच या तिघा गायचोरांची शोधाशोध सुरू केली. मात्र, गाय चोरण्यासाठी आलेले दोघे पळून गेले, तर एक व्यक्ती पकडण्यात त्यांना यश आले. त्यानंतर त्यांनी त्या व्यक्तीला अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात आणलं असता त्याने आपण कल्याणच्या गोविंदवाडी परिसरातून आलो असून गोहत्या करण्यासाठी आपण गाय चोरत असल्याची कबुली दिली.
उर्वरित साथीदारांचा अंबरनाथ पोलिसांकडून शोध सुरू
यानंतर बेशुद्ध गाईवर उपचार करून तिला तातडीने शुद्धीत आणण्यात आलं. दरम्यान, अंबरनाथ पोलिसांनी पकडलेल्या आरोपीची दुचाकी तपासली असता त्याच्या डिक्कीत बल्ब, ब्रेडचे पाकीट, पाईप, स्क्रू ड्रायव्हर असे साहित्य आढळून आले. ज्यामध्ये आरोपी हा गाई चोरण्यासाठी ब्रेडमध्ये गुंगीचं औषध टाकून ते गाईला खाऊ घालायचे. त्यानंतर गाय बेशुद्ध पडली की आपल्या साथीदारांना बोलावून ते बेशुद्ध झालेल्या गाईला गाडीमध्ये भरून गाय कत्तलखान्यात घेऊन जायचे. त्यानंतर त्या गाईची हत्या करून विक्री करायचे. अशी माहिती या आरोपीने दिली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. तर त्याच्या उर्वरित साथीदारांचा अंबरनाथ पोलिसांकडून शोध सुरू आहे. तर या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी गाईच्या मालकाने केली आहे.